मराठा समाजात लग्न समारंभ हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा प्रसंग असला तरी, गेल्या काही वर्षांत यात होणारा प्रचंड खर्च, हुंडा प्रथा आणि अनावश्यक रीतिरिवाजांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत या समस्येवर चर्चा करून खर्चाला आळा घालण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आचारसंहिता ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाने ठरवलेली आचारसंहिता लग्न समारंभ साधा आणि परवडणारा ठेवण्यावर भर देते.
1) लग्नसोहळा १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत करावा.
2) डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांचा वापर करावा.
3) प्री-वेडिंग शूट बंद करावे, आणि केले तरी ते समारंभात दाखवू नये.
4) लग्न वेळेवर लावावे आणि भाषणबाजी टाळावी.
5) कर्ज काढून समारंभ करू नये.
6) दारू पिऊन नाचण्यावर बंदी घालावी.
7) वधू-वर पित्यांनीच फेटे बांधावे.
8) सोन्याचे दागिने किंवा वाहनाच्या चाव्या भेट देण्याचे प्रकार टाळावे. हुंडा देणे-घेणे पूर्णपणे बंद करावे.मुलीच्या नावे बँकेत ठेव ठेवण्याचा पर्याय स्वीकारता येईल.
9) फेटा फक्त नवरदेव नववीच्या वडिलांनीच बांधावा.
10) लग्नातील जेवणात पाचच पदार्थ असावेत.
11) एकाच दिवसात साखरपुडा, हळद, लग्न ही कार्यक्रम असावेत.
12) लग्नात भेटवस्तू ऐवजी पुस्तक, रोप, रोख रक्कम दिली तरी चालेल.
13) दशक्रिया विधी पाचव्याच दिवशी करावा.
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मराठा समाजाने ११ जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. ही समिती आचारसंहितेची अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी कार्य करेल. प्रत्येक लग्न समारंभात ही आचारसंहिता वाचली जावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या समितीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचून अनावश्यक खर्च आणि प्रथांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुका स्तरावर गाठीभेटी घेऊन लोकांना सामुदायिक विवाह आणि साध्या पद्धतीने लग्न करण्यास प्रोत्साहन देण्याचेही ठरले.